पुण्यात आल्यापासून मी वारीसोबत चालण्यासाठी आवर्जून १ दिवस राखून ठेवतो. मग पुण्यातच काही किलोमीटरपुरतीच मर्यादित वारी करण्यापेक्षा एका दिवसात सायकलने पुणे ते पंढरपूर पुर्ण वारी करायला पाहीजे, हा विचार गेल्या २-३ वर्षांपासून डोक्यात घोळत होता. अखेर यावर्षी तो योग जुळून आलाच.
केवळ एक तासाची झोप आणि तळपत्या उन्हाच्या तडाख्यात राईड पूर्ण होईल का? याची थोडी धाकधूक वाटत होती, परंतु रणरणत्या उन्हात विठूरायाच्या कृपेची सावली सोबत असल्याने राईड नक्की पूर्ण होईल हा आत्मविश्वास ही होता , आणि तसं झालंही…
आयोजकांनी केलेल्या चोख आणि उत्तम व्यवस्थेमुळे भाजून काढणारया उन्हात ही पहिले १८५ किलोमीटर पार करणे सुसह्य झाले.
पण जसं आम्ही सोलापूर हायवे सोडून पंढरपूर फाट्याला वळलो तसा रस्ता ही बदलला आणि वाऱ्याची दिशा ही..
आतापर्यंत मागून असलेला वारा समोरुन आणि उजव्या बाजूने वाहू लागला. मग सायकलचे गियर्स ही बदलू लागले आणि गती ही.
साधारण २-३ किलोमीटर सायकल चालवल्यानंतर पुढे एक-एक किलोमीटरचं अंतर कापणं ही अवघड वाटू लागलं, पंढरपूर तर अजून ३५ किलोमीटर लांब होतं. एव्हाना उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी समोरुन येणाऱ्या वाऱ्याचा वेग मात्र वाढला होता.
अशा वेळी विशेषतः शरीर थकलेलं असताना वाऱ्याच्या झोताला चिरून सायकलला आणि स्वतःला पुढे ढकलत राहण्यासाठी आत्यंतिक गरज होती ती कमालीचं स्वयंप्रेरित असण्याची...
"बस, आता थोडंसच अंतर राहिलंय, मग झालंच!" हे सतत स्वतःला सांगत राहण्याची...
आणि इथूनच माझा "प्रवास आत्मसंवादाचा" सुरु झाला,असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.
बाहेर वाऱ्याशी आणि आत स्वतःशीच झगडत जेव्हा शेवटचा २० किलोमीटरचा टप्पा ओलांडून पंढरपूरात पोचलो तेव्हा मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ माजला होता. ठरवलेलं साध्य झालं होतं...
काही कार्यसिध्दी केल्यावर, "चक्क, आपण हे करू शकलो?" म्हणून स्वतःलाच अवाक करणाऱ्या असतात, तर काही "आटोपलं , बाबा एकदाचं " म्हणून सुटकेचा निश्वास टाकणाऱ्या असतात...
काही कामगिऱ्या फत्ते केल्या की कधी आपल्याला स्वतःच स्वतःचा अभिमान वाटतो तर कधी दुसऱ्याना आपला...
काही यशप्राप्ती आत्मविश्वास वाढवितात तर काही प्रगल्भता...
काही मैलाचे दगड पार केल्यावर कधी निखळ आनंद मिळतो तर कधी आत्मसुख आणि समाधान...
पण काही मोजक्या ध्येयपूर्तता अशा असतात, ज्या या सर्वांची संयुक्त अनुभूती देतात,
ही सायकलवारी त्यापैकी एक...
विद्येचे माहेरघर (पुणे) ते संतांचे माहेरघर (पंढरपूर) - २२६ किलोमीटरचा प्रवास…
पहिली सायकलवारी, विठ्ठल-रखुमाईच्या चरणी अर्पण…
ता. क. - "प्रवास आत्मसंवादाचा" हे या वर्षीच्या सायकलवारीचं घोषवाक्य होतं.


Comments