पंढरपूर सायकल वारी
काही दिवसांपूर्वी पंढरपूर सायकल वारीची पोस्ट वाचली आणि सगळ्यांसोबत करायचं म्हणून रजिस्टर करून टाकल. तस पाहायला गेलं तर सायकल वेड हे काही काही महिन्यांपूर्वीच लाग, पण कधी विचारही केला नव्हता की आपल वेड आपल्याला पंढरपूर पर्यंत नेईल.
रजिस्ट्रेशन झालं आणि प्रॅक्टिस राईड्सचं सुरू झाल्या. पहिली थेऊर राईड आणि भुलेश्वर राईड आणि शेवटची देहू आळंदी राईड करता आली. नंतर वारीला काय काळजी घ्यावी आणि कसा प्रवास करावा ह्या बाबत मीटिंगही झाली. आणि तो दिवस आला.
रात्री ३ वाजता शिवाजी पुतळा कोथरूड इथून सुरवात झाली. धर हॅण्डल मार पेंडल करत विठ्ठलाचा गजर करत सगळे सायकल वारकरी वारीला निघाले. पहिला ब्रेक डायरेक्ट गुरुदत्त हॉटेल जवळ घेतला. फार लवकरची वेळ होती त्यामुळे नाष्टा न करता फक्त चहा पिऊन पुढे निघालो. सकाळी ९च्या सुमारास १००किमीचा टप्पा पार केला, पण खरी कसरत पुढे होती.
जसा दिवस उजाडत होता तस तस ऊन वाढायला लागलं. एवढ्या रणरणत्या उन्हातही सगळे सायकल वारकरी आपली जिद्द आणि विठुमाऊलीला भेटायच्या ओढीमुळे हरले नाही. सायकलिंग करत करत इंदापूर लंच पॉइंटला पोहोचलो आणि थोडा सुटकेचा निःश्वास टाकला.
भरपेट जेवायचं फक्त पोटाला आधार मिळेल एवढंच खायचं हे आधी ठरवलेलं होत आणि तसच केलं. जेवण झालं आणि थोडी विश्रांती घेतली. जेवणानंतर मुंगीच्या पावलांनी सुरवात करत करत आणि प्रत्येक hydration पॉईंटला थांबत थांबत संध्याकाळी ४ला तेंबुर्डीला पोचलो.
शेवटचे ४०चं राहिलेत अस लक्षात आल आणि एक वेगळाच आनंद झाला, आपल्या आणि विठुरायाच्या भेटीला आता फक्त ४०किमी राहिलेत. तेंभूर्डी फाट्यावरून उजवीकडे वळलो आणि खरी परीक्षा सुरू झाली. थकलेला देह कुठेतरी थांबावं अस म्हणत होता पण जो पर्यंत मन साथ देत होत तो पर्यंत पुढे जायचच.
शेवटी प्रेरणा ताई, धनश्री ताई, मकरंद दादा आणि अमोल दादा आणि मी आम्ही एकमेकाला साथ देत आणि एकमेकांच मनोबल वाढवत पुढे होतो होतो. सतत दिसणारा चढता रस्ता आणि उलट दिशेने येणारी वेगवान वाहने ह्यामुळे वेग सतत मंदावत होता. पण म्हणतात ना देव परीक्षा घेतो आणि जो प्रयत्न करतो त्यालाच देव फळ देतो त्याचा प्रत्यय आला.
१४-१५च्या वेगाने हळू हळू पुढे होत होत शेवटी पंढरपूर दारी पोहोचलो. आणि एक वेगळीच एनर्जी आणि वेगळाच उत्साह वाटू लागला. आयुष्यात पहिल्यांदा २२०किमीचा सायकल पल्ला आपण पूर्ण केला आणि तोही थेट विठुमाऊलीसाठी.
सगळ झालं आणि नंतर मुख दर्शनाला निघालो. अत्यंत सुंदर आणि प्रसन्न करणारी मूर्ती बघून "याचं साठी केला होता अट्टाहास", मन तृप्त झालं.
त्या मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल दिसला की नाही मला माहीत नाही पण आम्ही निघाल्यापासून शेवटपर्यंत आम्हाला मदतीसाठी थांबलेल्या hydration ट्रक्स, सपोर्ट ग्रुप, सायकल दुरुस्ती करणाऱ्यांमध्ये आणि मंगेश दादा ज्याने माझ्या पायात गोळे आल्यावर माझ्यासोबत थांबून मला धीर देत माझ्या सोबत सायकलिंग केलं त्या प्रत्येकात मला विठ्ठल दिसला.
ही खरी विठ्ठल वारी नव्हतीच, ही तर आत्म संवादाची... आत्म शोधाची होती.
||विठ्ठल विठ्ठल विठोबा माऊली||


Comments